गुंजवणीचे काम भर पावसात बंद पाडले   

वाल्हे, (वार्ताहर) : पुरंदर तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणार्‍या गुंजवणी जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम १९९३ च्या जुन्या पाहणी नुसार होत नसल्याच्या कारणास्तव वाल्हे येथील ग्रामस्थांनी भर पावसात एल्गार पुकारून गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचे काम बंद पाडले.
 
सुरवातीच्या काळात हरित लवाद तसेच जलसंपत्ती नियमन प्राधिकरण येथील खटल्यांमुळे गुंजवणी सिंचन प्रकल्प पुरता रेंगाळला होता. त्यातच गुंजवणीच्या मूळ योजनेत २१ जुलै २०२० मध्ये जाणीवपूर्वक बदल केल्याच्या आरोपावरून तसेच शेतकर्‍यांना उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेता माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार विजय शिवतारे व माजी आमदार संजय जगताप यांच्यात कित्येक वर्षे आरोप प्रत्यारोप सुरूच होते. मात्र, केंद्र सरकारच्या पीआयएन धोरणानुसार राबविला जाणारा गुंजवणी सिंचन प्रकल्प १९९३च्या जुन्या पाहणीनुसार ठरविलेल्या गावातूनच राबविला जाणार असल्याने एकरी दीड लाख रुपये वसूल करून ठिबक पद्धतीने शेतकर्‍यांना पाणी देण्याऐवजी गावातील पाणीसाठे प्रवाही पद्धतीने भरून देऊ, असे आश्वासन राज्याच्या जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी काही वर्षापूर्वी पुरंदरच्या शिष्ठ मंडळास दिले होते.
 
या प्रकल्पास खर्‍या अर्थाने सुरवात करण्यात आली होती. परंतु गुंजवणी जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम १९९३ च्या जुन्या पाहणी नुसार प्रत्यक्षात होत नसल्याच्या कारणास्तव वाल्हे येथील ग्रामस्थांनी तातडीची बैठक बोलावली . या बैठकीत प्रत्यक्षात सुरु असलेल्या गुंजवणी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सदरील काम चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याने गुंजवणी सिंचन प्रकल्पाचा वाल्हेसह बापसायवस्ती पातरमळा वागदरवाडी राख दौंडज आदी भागाला काहीच फायदा होणार नसल्याच्या कारणास्तव येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ग्रामस्थांनी भर पावसात हरणी फाट्या जवळ कुसाळवाडीच्या टेकडीवर सुरु असलेल्या गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचे काम अक्षरशः बंद पाडले. तसेच १९९३ च्या जुन्या सर्व्हेनुसारच काम सुरु करावे, अशी मागणी देखील संबंधितांकडे केली.  याप्रसंगी बाळासाहेब राउत फत्तेसिंग पवार, सचिन देशपांडे, आझाद पवार, समदास राऊत, रणसिंग पवार, भाऊसाहेब भोसले, दत्तात्रेय राऊत, विठ्ठल पवार, कांतीलाल भुजबळ, योगेश पवार, रोहिदास राऊत सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles